Monday, March 18, 2013

अपरिचित गढी - अळकुटी

आपल्या महाराष्ट्रात वैभवशाली इतिहास असूनही उपेक्षित असलेली ठिकाणे कमी नाहीत. त्यापैकीच एक - अळकुटी. आळे - पारनेर रस्त्यावर वसलेले हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आहे. प्राचीन कल्याण - नाणेघाट - जुन्नर - पैठण ह्या व्यापारी मार्गावरील हे महत्वाचे ठाणे. गावाचे पूर्वीचे नाव अमरापूर असून येथे कपड्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. पुढे गाव आवळकंठी म्हणून ओळखले जाऊ लागले. ब्रिटीशांनी उच्चारण्यास सोपे जावे म्हणून बदलून केले, अळकुटी ! गावास उत्तर व दक्षिण भागात दोन वेशी असून, त्याला जोडून पूर्वी तटबंदी व आठ बुरुज होते. गावातील बहुतांश ऐतिहासिक खुणा आता नामशेष झाल्या असल्या तरी सरदार कदमबांडे ह्यांची चार एकर जमिनीवर पसरलेली भक्कम गढी आजही गतकाळाची महती सांगत उभी आहे.

अळकुटी गढी














अळकुटी गढी

गढीचे भव्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून दणकट आहे. कमानिच्यावर कमळपुष्पे, शरभ शिल्पे आढळतात. प्रवेशद्वाराचा खालचा भाग दणकट घडीव दगडांचा आणि वरील दोन मजली बांधकाम विटांचे पण अत्यंत सुबक आहे. त्यात रेखीव जाळ्यांची, सुंदर गवाक्षे आहेत.

गवाक्ष 

प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूस प्रशस्त देवड्या आहेत. वरील भागात जाण्यासाठी डावी-उजवीकडून जिने आहेत, पैकी एक बुजलेला आहे. गढी साधारण १८ व्या शतकाच्या सुरुवातीस बांधण्यात आली पण तटबंदी आजही शाबूत असून आपल्या दणकटपणाची कल्पना देत ताठ उभी आहे. तटाची रुंदी सहा फुट आहे.
फांजी आणि प्रवेशद्वारावरील बांधकाम 


तटबंदी
तटबंदीतील वैशिष्ट्यपूर्ण जंग्या आजही सुस्थितीत आहेत.
Add caption
जंग्या



गढीला चार भक्कम बुरुज आहेत. प्रत्येकात एक मजली बांधकाम आहे. आग्नेय दिशेच्या बुरुजातील वर जाणा-या पाय-या सुस्थितीत आहेत. वरील भागात गोलाकार पक्के बांधकाम असून मध्यभागी खळगा आहे. बहुदा ध्वजस्तंभ उभारण्याची ही जागा असावी.
ध्वजस्तंभ उभारण्याची जागा

इतर तीन बुरुजांच्या आतील भागाची खूप पडझड झालेली असून  पाय-या आणि वरील मजल्याचे वेगळे अस्तित्व नाहीसे झाले आहे. गढीच्या आतील दुमजली चौसोपी वाडा आज अस्तित्वात नाही. वाड्याची काही जोती पहावयास मिळतात. त्यावरील एक सोपा जेमतेम उभा आहे. बाजूलाच बारमाही पाणी असलेली विहीर आहे. वाड्यातील भुयार, दालने, नक्षीकाम असलेले खांब, सिंहासन अशा अनेक गोष्टी काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत.

बुरुज
शहाजीराजे भोसले आणि कृष्णाजी व व्यंकोजी कदमबांडे हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. पुढे कदमबांडे, मोघलांचे जहागीरदार झाले. ते स्वत:चे पायदळ आणि घोडदळ बाळगून होते. मल्हारराव होळकर हे सरदार कांताजी कदमबांडे यांच्या घोडदळात होते आणि तेथून त्यांच्या पराक्रमाचा उदय झाला. पुढे बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत, गुजरात मोहिमेतील पराक्रमाबद्दल सरदार कांताजी कदमबांडे यांना धुळे, रनाळा, कोपर्ली, तोरखेड भाग मिळाला. त्यांचे पराक्रमी बंधू रघोजीराव, मल्हारराव या पुत्रासोबत तोरखेडला स्थायिक झाले तर दुसरा पुत्र कमळाजी अळकुटी येथेच राहिला. आजही गढीत सरदार कदमबांडे यांचे वंशज वास्तव्य करून आहेत.

गढी शेजारीच महादेवाचे मंदिर सरदार कदमबांडे यांनी बांधून घेतले. त्यात देवनागरीत खालीलप्रमाणे शिलालेख आहे -

" श्री सीवचरणि दृढभाव 
कमळाजी
सुत रघोजी कदमराव पाटिल
मोकदम मौजे आमरापूर
उर्फ आवळकंठी
प्रगणे कर्डे सरकार जुन्नर
के १६७२
श्री मुखनाम संवत्सरे
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा
_ _ _ _ _ _ _ _ _ शुभं भवतु "
         

असे हे वैभवशाली इतिहास लाभलेले अळकुटी ; गड - किल्ले, ऐतिहासिक वास्तू पाहणा-यांनाही परिचित नाही. एक दिवसात अळकुटीसोबत लोणी मावळा येथील तटबंदी, प्रवेशद्वार तसेच वडगाव दर्या गुहेतील देवीच्या मंदिरातील ‘लवण-स्तंभ’ , निघोज येथील रांजणखळगे ही ठिकाणे देखील पहाता येऊ शकतात. 

संदर्भ -
१. लोकहित (अळकुटी परिसर विशेषांक - २०१०)
२. डॉ. सदाशिव शिवदे यांचा लेख - ' सरदार कदमबांडे यांचा वाडा '


- राजन महाजन / अमेय गोखले